< एस्तेर 1 >

1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत (अहश्वेरोश राजा भारत देशापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस प्रांतांवर राज्य करत होता), 2 असे झाले की, त्या दिवसात शूशन या राजवाड्यातील राजासनावर राजा अहश्वेरोश बसला होता. 3 आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी, त्याने आपले सर्व प्रधान आणि सेवक यांना मेजवानी दिली. पारस आणि माद्य या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि सरदार त्याच्यासमोर उपस्थित होते. 4 त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे एकशेऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले. 5 जेव्हा ते दिवस संपले, तेव्हा राजाने सात दिवसपर्यंत मेजवानी दिली. शूशन राजवाडयातील सर्व लोकांस, लहानापासून थोरांपर्यंत होती, ती राजाच्या राजवाड्यातील बागेच्या अंगणात होती. 6 बागेच्या अंगणात तलम सुताचे पांढरे व जांभळे शोभेचे पडदे टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभाला लावले होते. तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढऱ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या आणि इतर रंगीत मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवले होते. 7 सोन्याच्या पेल्यांतून पेयपदार्थ वाढले जात होते. प्रत्येक पेला अव्दितीय असा होता आणि राजाच्या उदारपणाप्रमाणे राजकीय द्राक्षरस पुष्कळच होता. 8 हे पिणे नियमानुसार होते. कोणी कोणाला आग्रह करीत नसे. प्रत्येक आमंत्रिताच्या इच्छेप्रमाणे करावे अशी राजाने आपल्या राजमहालातील सर्व सेवकांना आज्ञा केली होती. 9 वश्ती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली. 10 १० मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षरस प्याल्याने उल्हासीत मनःस्थितीत होता. तेव्हा आपल्या सेवा करत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस, या सात खोजांना आज्ञा केली की, 11 ११ वश्ती राणीला राजमुकुट घालून आपल्याकडे आणावे. आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिची सुंदरता दाखवावी अशी त्याची इच्छा होती. कारण तिचा चेहरा अति आकर्षक होता. 12 १२ पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला; त्याचा क्रोधाग्नी भडकला. 13 १३ तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले, कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्यासंबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. 14 १४ आता त्यास जवळची होती त्यांची नावे कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि माद्य मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. 15 १५ राजाने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी? कारण तिने अहश्वेरोश राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तिचे उल्लंघन केले आहे.” 16 १६ ममुखानाने राजा व अधिकाऱ्यांसमक्ष म्हटले, वश्ती राणीने केवळ अहश्वेरोश राजाविरूद्ध चुकीचे केले नाही, पण राज्यातील सर्व सरदार व अहश्वेरोश राजाच्या प्रांतातील सर्व प्रजेविरूद्ध केले आहे. 17 १७ राणी वश्ती अशी वागली हे सर्व स्त्रियांना समजेल. तेव्हा त्यांना आपल्या पतींला तुच्छ मानण्यास ते कारण होईल. त्या म्हणतील, अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणण्याची आज्ञा केली पण तिने नकार दिला. 18 १८ राणीचे कृत्य आजच पारस आणि माद्य इथल्या अधिकाऱ्यांच्या स्त्रियांच्या कानावर गेले आहे. त्या स्त्रियाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप होईल. 19 १९ जर राजाची मर्जी असल्यास, राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यामध्ये काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि माद्य यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की, वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कोणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. 20 २० जेव्हा राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की, सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतींचा मान ठेवतील. 21 २१ या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदीत झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली. 22 २२ राजाच्या सर्व प्रांतात, प्रत्येक प्रांताकडे त्याच्या त्याच्या लिपीप्रमाणे व प्रत्येक राष्ट्राकडे त्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे त्याने पत्रे पाठवली की, प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी, हा आदेश राज्यातील प्रत्येक लोकांच्या भाषेत देण्यात आला होता.

< एस्तेर 1 >